
🔷 खा.प्रितमताई मुंडे यांनी दिल्या राष्ट्रीय महामार्ग विभागाला सूचना ; डिसेंबरच्या पहील्या आठवड्यात प्रवाश्यांच्या समस्या सुटणार
बीड/परळी-वैजनाथ /एम एन सी न्यूज नेटवर्क – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 एफ या मार्गावर परळी ते सिरसाळा दरम्यान सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे वाहतूक धारकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो आहे. या परिसरातील नागरिक आणि प्रवाश्यांच्या तक्रारींची दखल घेऊन खा.प्रितमताई मुंडे यांनी दिनांक २९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदारांची बैठक घेऊन रस्त्याच्या एका बाजूने वाहतुक सुरळीत सुरू राहण्यासाठी विविध सूचना केल्या.
परळी-सिरसाळा मार्गाच्या दुहेरीकरणामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे एकाचवेळी खोदकाम करण्यात आल्याने यया मार्गावरील वाहतुकीत अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. या मार्गाहुन प्रवास करणारे वाहतूकधारक आणि प्रवासी रस्त्याच्या हे दुरावस्थेमुळे त्रस्त असल्याची बाब समजताच खा.प्रितमताई मुंडे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाची बैठक बोलावली आणि रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी सुरळीत करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
राष्ट्रीय महामार्ग विभागाने वाहतुकीला होणारे अडथळे दूर करण्यासाठी एका बाजूने मुरूम भरायचे काम करताना दुसरी बाजू सुरळीत ठेवण्याचे काम हाती घेणार असल्याचे यावेळी सांगितले. मुरूम भरताना धूळ नियंत्रित करण्याकरिता नियमित पाणी टाकणे, पुलांच्या रुंदीकरणाचे काम सुरू करणे, रस्त्याचे काम प्रगतीपथावर असल्याने जड आणि मोठी वाहतूक पर्यायी रस्त्याने वळविती करण्याकरिता परिवहन विभागासोबत चर्चा करणे अशा विविध सूचना खा.प्रितमताई मुंडे यांनी विभागाला दिल्या आहेत. त्यांमुळे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परळी-सिरसाळा रस्त्याची एक बाजू वाहतूकीसाठी सुरळीत होणाची शक्यता आहे.
तसेच या बैठकीत परळी बाह्यवळण रस्त्याच्या जंक्शनची तात्काळ दुरुस्ती करण्याच्या ही सूचना त्यांनी दिल्या आहेत. नाथ्रा फाट्याजवळ खोल खोदकाम केल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने दक्षता घेण्याची बाब खा.प्रितमताईंनी विभागाच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग 561 व 361एफ आणि बीड शहरातील अडीच किमीच्या कामाचा ही आढावा घेतला. दरम्यान परळी ते बीड रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची आणि बीड शहरातून जाणाऱ्या मार्गाचे मजबूतीकरण करण्याची सातत्यपूर्ण मागणी खा.प्रितमताई मुंडे यांनी अनेकवेळा केंद्र सरकार कडे केली आहे.

