🔷 ९६ हजार परीक्षार्थी
लातूर : आज २१ फेब्रुवारी, बुधवार पासून . महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात झाली. लातूर विभागीय मंडळातील ९६ हजार १७९ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यासाठी २३८ केंद्रांची निवड करण्यात आली असून, बुधवारी पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने शिक्षण मंडळाकडून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे.
लातूर विभागीय मंडळात नांदेड, धाराशिव आणि लातूर या तीन जिल्ह्यांचा समावेश असून, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा यापूर्वीच पार पडल्या आहेत. बुधवारपासून लेखी परीक्षेला सुरुवात होणार असून, परीक्षा केंद्र असे आहेत. लातूर जिल्ह्यात ९५, धाराशिव ४२ आणि नांदेड जिल्ह्यातील १०१ केंद्रांवर या परीक्षा होणार आहेत. २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत परीक्षा होणार असून, काही विषयांचे पेपर सकाळी ११ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ अशा सत्रात होणार आहेत.