परळीचा सर्वांगिण विकास आणि शांतता अबाधित राखण्यासाठी निवडणूक लढविणार – काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख

परळीत काँग्रेसची पत्रकार परिषद

परळी वैजनाथ – प्रतिनिधी – परळीचा सर्वांगीण विकास तीर्थक्षेत्र  प्रभू वैजनाथ यांच्या नगरीला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच सर्व धर्मीय सर्वसामान्य माणूस यांना सुख, समाधान, आनंदी व भयमुक्त वातावरणात जगता यावे परळी शहर व मतदार संघात शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपण निवडणूक लढवणार आहोत अशी घोषणा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी मंगळवार दिनांक 23 जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केली.

बीड जिल्ह्यात आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या खासदार सौ. रजनीताई पाटील, प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले, माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहोत. लोकसभा निवडणुकीतील लक्षवेधी विजयानंतर महाविकास आघाडीवरील सर्वसामान्य जनतेचा विश्वास कायम आहे. हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. बीड जिल्ह्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे समविचारी पक्ष व संघटनेतील नेते आणि कार्यकर्ते यांचा ओढा वाढत आहे.
अनेक जण काँग्रेस पक्षाच्या संपकांत आहेत. काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुक ताकदीने लढविणार आहे. याचाच एक भाग म्हणून मी स्वतः परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, बारामती, लातूर, पुणे शहराच्या धरतीवर परळी शहरासह संपूर्ण मतदारसंघाचा विकास करणे आणि परळी शहर व मतदारसंघात शांतता, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपण निवडणूक लढविणार आहोत.
आपण निवडणूक लढवावी अशी परळी विधानसभा मतदारसंघातील सर्वधर्मिय मतदार आणि सर्वसामान्य माणसाची प्रामाणिक इच्छा आहे. त्यांच्या भावनेचा आदर करून आपण परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहोत.

याबाबत मी व माझ्या सहकाऱ्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकत्यांनी राष्ट्रीय नेत्या खासदार सौ. रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेशजी चेन्नीथला प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांना भेटून आपणांस उमेदवारी देण्याची विनंती केली आहे. तसेच या विषयावर महाविकास  आघाडीला तिकीट मागणार असून याबाबत आपण महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते खा. शरदचंद्र पवार साहेब, माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील, खा. सुप्रियाताई सुळे, खा. संजयजी राऊत यांच्यासह इतर नेत्यांची भेट घेऊन महाविकास आघाडी तर्फे अधिकृत उमेदवारी मागणार आहोत.  या भेटीत परळी मतदारसंघातील सध्याच्या परिस्थितीची माहिती ही आपण त्यांना देणार आहोत. अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी मंगळवारी परळी वैजनाथ येथे आयोजित पत्रकार परिषदेतून दिली. या पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष सय्यद हनीफ बहादुर भाई,तालुका अध्यक्ष अनिल जाधव , उपाध्यक्ष, शुभम देशमुख ,वैजनाथ गडेकर, इथे शाम खातिब, प्रवाक्ते बद्दरभाई, ज्येष्ठ नेते प्रकाश देशमुख,दीपक शिरसाट, समंदर खान पठाण रणजित देशमुख,निर्मळ पाटील इत्यादी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

सलग सत्तेत तरीही, परळीचा विकास नाही

परळी वैजनाथ हे सुप्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. या शहरात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. रेल्वे, वीज निर्मिती सारखे महत्त्वाचे प्रकल्प असून ही आज परळी शहरात कायद्याचे राज्य नाही. शिक्षणाच्या सोयी व रोजगार उपलब्ध नाही. अधिकारी, नौकरदार, व्यापारी, महिला, मुली, विद्यार्थी, अल्पसंख्यांक हे सर्व घटक आज दहशतीखाली जीवन जगत आहेत. शहरातील श्रीमंत, ऐपतदार लोक अंबाजोगाई, लातूर, पुणे येथे कुटुंबासह स्थलांतरित झाले आहेत. शेतकरी अनुदान व पीक विम्यापासून वंचित आहेत. परळीत उद्योग, व्यवसाय प्रगतीपथावर नाहीत हे चित्र आता बदलले पाहिजे, नेहमीच परळीकरांच्या आशिर्वादावर केवळ स्वतःच मोठे झालेल्यांना सलग सत्तेत राहून ही परळीचा विकास करता येवू नये ही मोठी शोकांतिका आहे.

त्यामुळे या पुढे परळीचा सर्वांगिण विकास व्हावा, श्रीक्षेत्र प्रभु वैद्यनाथ यांच्या नगरीला गतवैभव मिळावे, सर्वधर्मिय नागरिक, सर्वसामान्य माणूस यांना सुख, समाधान, आनंदी व भयमुक्त वातावरणात समृद्ध जीवन जगता यावे, परळी मतदारसंघातील विद्याथ्यांना दर्जेदार शिक्षण व  शहरासह मतदारसंघात शांतता, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपण परळी मतदारसंघातील लोकांच्या प्रेमापोटी, लोकभावनेचा आदर करून विधानसभा निवडणूक लढन्याचे राजेसाहेब देशमुख म्हणाले.