वॉक फॉर दि नेशन”

🔺Walk For The Nation

🔺“कारगिल विजय दिवस” रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने दि.२६ जुलै रोजी

🔺लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह, भायखळा येथे पारंपारिक फॅशन शो चे आयोजन

ठाणे, दि. 24 (जिमाका) : कारगिल विजय दिवसाला दि.२६ जुलै २०२४ रोजी पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत. या रौप्य महोत्सवी वर्षाचे निमित्त साधून, देशासाठी शहीद झालेल्या वीरांच्या शौर्याची व बलिदानाची आठवण व सैनिकांप्रती असलेली देशभक्ती भारतीय जनतेच्या मनात सदैव जागृत राहावी, याकरिता मुंबईस्थित “व्हॅलियंट फेम आयकॅान” या सामाजिक संस्थेने दि.२६ जुलै २०२४ रोजी शहीद सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना म्हणून #walkforthenation या विषयांतर्गत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह, भायखळा, मुंबई येथे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या सहकार्याने पारंपारिक फॅशन शो (Walk For The Nation) चा कार्यक्रम आयोजित केला आहे.

या कार्यक्रमास आर्मी, नेव्ही, एअरफोर्स अशा भारतीय संरक्षण दलातील तिन्ही विभागातील सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी, प्रत्यक्ष कारगिल युध्दात पराक्रम गाजविलेले सैन्याधिकारी-जवान उपस्थित राहणार असून ते या कार्यक्रमात या शौर्य दिवसाच्या निमित्ताने इतर स्पर्धकांसह रॅम्प वॅाक (Walk For The Nation) करणार आहेत. तसेच मनोरंजनाच्या कार्यक्रमाबरोबरच देशभक्तीपर डॉक्युमेंटरीज व लोककलेचेही सादरीकरण या कार्यक्रमात होणार आहे. याबरोबरच ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांचा देशप्रेमावर आधारित “शहीद कॅप्टन विनायक गोरे” या एकपात्री प्रयोगाचेही सादरीकरण होणार आहे.

एकंदरीतच आजच्या तरुण पिढीला भारतीय सैन्याविषयीची त्यांच्या परक्रमाबद्दलची माहिती व्हावी, त्यांच्याबद्दलचा आदरभाव, अभिमान, प्रेम वृध्दींगत व्हावे, त्यांची वीरवृत्ती, देशाप्रती त्यांची श्रद्धा, शारीरिक व मानसिक सामर्थ्य, स्वयंशिस्त या उद्दिष्टांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आजच्या तरुण पीढीला देशकार्यासाठी प्रोत्साहित करणे, समाजात ध्वजदिन निधीबाबत जागरुकता वाढावी, हा या कार्यक्रमाच्या आयोजनाचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
आपल्या भारतमातेसाठी सैनिकांनी केलेल्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता आपण सर्वांनी या कार्यक्रमास जरुर उपस्थित राहावे, या कार्यक्रमाची तिकिटे Bookmyshow वर उपलब्ध आहेत. इच्छुकांनी या तिकिटांद्वारे आपले आसन आरक्षित करावे किंवा 91521 51296 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या संस्थापक-अध्यक्ष अंजली साखरे यांनी केले आहे.