● सरकारच्या मदतीच्या घोषणांची अतिवृष्टी तर शेतकऱ्यांच्या गळाला फास
परळी -वैजनाथ – आठवड्यामध्ये सलग दोन दिवस पावसाने जोरदार हजेरील लावली होती. यामुळे जिल्हयातील 61 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली होती, अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला असून जिल्ह्यातील 657 गावांमधील 1 लाख 44 हजार 564 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.मात्र संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरात अद्याप देखील कवडी देखील मिळाली नसल्याने शेतकरी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपवून घेत आहे. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला असून लाखो एक्करावर उभे असलेले पीक पावसाच्या पाण्याने जमीनदोस्त झाले आहे.
अतिवृष्टीमुळे शेतातील बाजरी, सोयाबीन, कापूस, उडीद, तुर, मुग आदींसह फळ आणि पालेभाज्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बीड, माजलगाव, गेवराई, अंबाजोगाई आणि परळी तालुक्यांना बसला असून या तालुक्यातील १०० पेक्षा अधिक गावातील शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ याला तोंड देत शेती करणारा जिल्ह्यातील शेतकरी यावर्षीच्या अतिवृष्टीने पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.सततची नापिकी, कर्ज आणि सरकारची नाकर्ती भूमिका यामुळे शेतकरी आत्महत्या सारख्या घटना घडताना समोर येत असून राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री असलेल्या मंत्री महोदय यांच्याच मतदार संघात परळी, रेवेली आणि कौडगाव साबळा येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.सरकारने बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी यासह विविध मागण्या संदर्भात किसान सभेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती किसान सभेकडून कॉ. काशीराम सिरसाट,कॉ. गंगाधर पोटभरे, कॉ.भगवान बडे, कॉ.मुरलीधर नागरगोजे, कॉ. विष्णू देशमुख,कॉ. कृष्णा सोळके,कॉ. पाडूरंग राठोड कॉ. जगतीश फरताडे, कॉ. दादासाहेब सिरसाट, कॉ.एड. संजय चोले, कॉ.राजाभाऊ बादाडे, कॉ.रूस्तुम माने,कॉ.बळीराम देशमुख, कॉ.एड.अजय बुरांडे,डॉ. सावळाराम उबाळे आदींनी
प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
===========
सत्ताधा-याची असंवेदनशीलता तर किसान सभा पुन्हा रस्त्यावर
जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या यांच्याच मतदार संघात तीन शेतकऱ्यांनी मागील 7 दिवसात जीवन संपवून घेतले आहे या पार्श्वभूमीवर पिकविमा वितरण पारदर्शक करण्यासाठी सन २०२३ खरीप व रब्बी पिक विमा वितरणाच्या याद्या प्रकाशित कराव्यात.कापूस – सोयाबीन पिकांची ईपीक पाहणीची अट रद्द करून कुठल्याही अटी शर्ती शिवाय दोन्ही पिकांसाठी प्रत्येकी तीन-तीन हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्यात यावी. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील महसूल मंडळातील सर्व शेतकऱ्यांना NDRF च्या निकषासह व अतिवृष्टीची नोंद नसलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सततच्या पावसाचे अनुदान द्यावे.अतिवृष्टीने नुकसान झालेल्या विमाधारक शेतकऱ्यांना सॅम्पल सर्वे च्या आधारे तातडीने पिक विमा प्रावधानानुसार पीक विमा अदा करावा.शेतकऱ्यांचे संपूर्ण पीककर्ज सरसकट माफ करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे.
कॉ. एड.अजय बुरांडे
जिल्हाध्यक्ष बीड जिल्हा किसान सभा