■ परतीचा पावसाने होत्याचे नव्हते केले ; सोयाबीनला कोंब तर कापूसाच्या झाल्या वाती
परळी वैजनाथ – परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यात पावसाने पुन्हा थैमान घातले.अतिवृष्टीमुळे थोडा-फार हातातोंडाशी आलेला घास देखील या पावसाने हिरावला. सोयाबीनच्या शेंगांची गळती झाली तर वेचणीस आलेल्या कापसाच्या वाती झाल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मानसिक पाठबळ देण्यासाठी किसान सभेने परळी तालुक्यातील अनेक गावातील शिवारातील शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन उभ्या पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करत बळीराजाला तातडीने मदत करावी अशी मागणी किसान सभेचे बीड जिल्हाध्यक्ष कॉ.एड.अजय बुरांडे यांनी केली.
परतीच्या पावसामुळे नद्या, नाले, ओढे खळाळले असून नदीला आलेल्या पुरामुळे सध्या सोयाबीन, कापूस शेतकऱ्यांच्या शेतात उभे असून सोयाबीन काढणीसाठी आले असताना जोरदार पडलेल्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांना गळती लागली तर वेचणीसाठी आलेला कापसाच्या पावसामुळे वाती झाल्या आहेत.काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली होती. त्याचेच पंचनामे पूर्ण झाले नाहीत तर आता परतीच्या पावसाने पुन्हा शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पहिलीच नुकसान भरपाई मिळाली नाही. आता दुसऱ्यांदा पडलेल्या पावसाने शेतकरी हतबल झाला आहे. पहिलेच पंचनामे अर्धवट असताना या आहे. नुकसानीचे पंचनामे कधी करणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकऱ्यांच्या नशीबी कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ यामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. मागच्या वर्षीचा भावातील फरक म्हणून पाच हजार रुपये शासनाने फरक देण्याचे घोषित केली आहे ते मिळाले नाहीत. अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळाली नाही. आता हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. याकडे सरकारने लक्ष देवून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी किसान सभेकडून करण्यात आली आहे.या याप्रसंगी किसान सभेचे कॉ. बाबासाहेब बडे, दत्तात्रय गव्हाणे, जालिंदर गव्हाणे, बालाजी कडबाने आदिसह शेतकरी बांधव उपस्थित होते.
🔴 तर संघर्ष तीव्र करणार – कॉ.अजय बुरांडे
परतीच्या मान्सून मध्ये झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे निसर्गाने हिरावून घेतला. यामुळे एकीकडे आसमानी संकटाशी सामना करणारा बळीराजा दुसरीकडे शासन आणि प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे सुलतानीच्या कचाट्यात सापडला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळेत मदत करावी अन्यथा किसान सभेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी आणि शेतमजुरांना एकत्र घेऊन शासनासोबत आम्हाला संघर्ष करावा लागेल अशी प्रतिक्रिया किसान सभेचे जिल्हाध्यक्ष काँ.अजय बुरांडे यांनी दिली.

