जळगाव रेल्वे दुर्घटना ११ ठार ९ जखमी

छायाचित्र साभार- कोकणी.ईन

🔷 रेल्वे दुर्घटना

🔻 मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत, जखमींचा संपूर्ण उपचार मोफत- मुख्यमंत्री

भुसावळ /जळगांव– अतिशय दुर्दैवी असा पुष्पक एक्सप्रेस चा अपघात घडला असून जळगाव रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. तर या अपघातातील सर्व जखमींचा संपूर्ण उपचार मोफत करण्यात येईल. जखमींच्या नातेवाईकांना रुग्णालयात सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्री गिरीष महाजन घटनास्थळी दाखल झाले असून सर्व परिस्थिती सांभाळत आहेत, अशी माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

कर्नाटक एक्सप्रेसने पुष्पक एक्सप्रेसच्या अनेक प्रवाशांना उडवल्याची भयंकर घटना बुधवारी सायंकाळी 4 च्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वे स्थानकालगत घडली आहे. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्सप्रेस गाडीने अचानक ब्रेक लावल्यामुळे तिच्या चाक आणि रेल्वे रूळ यात मोठ्या प्रमाणावर घर्षण झाल्याने ठिणग्या उडल्या होत्या.एका अंदाजानुसार दारात बसलेल्या प्रवाशांना रेल्वेला आग लागल्याची वाटले. आणि आगीची अफवा पसरल्यामुळे प्रवाशांनी जिवाच्या आकांताने खाली उड्या मारल्या. प्राथमिक माहितीनुसार त्याचवेळी दुसऱ्या ट्रॅकवरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने त्यांना उडवले. या दुर्घटनेत पुष्पक एक्सप्रेस मधून उडी मारून बाहेर आलेले 11 जण ठार, तर ८ ते १० प्रवाशी जखमी झाल्याची माहिती आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी तीव्र वळण होते. परिणामी, दुसऱ्या ट्रॅकवर बसलेल्या प्रवाशांना रेल्वे येत असल्याचे लक्षात आले नाही. त्यामुळेच वेगाने येणाऱ्या कर्नाटक संपर्क क्रांतीने इतक्या मोठ्या संख्येने लोक चिरडले गेले.