🔶विशेष लेख
सर्वेषां शार्तीं भवतु
सर्वेषां पूर्ण भवतु
सर्वेषां मंगलम् भवतु
लोकाःसमस्ताः
सुखिनो भवतु !
शांती मंत्रातील हा उत्तर भाग सहसा म्हटला जात नाही.
पण सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणात आपल्या तीस/पस्तीस मिनिटाच्या परिपाठाच्या समारोपात शांती मंत्रातील हा भागही नाणेकर सर अगदी भावूकतेने व श्रृध्देने म्हणायचे आणि त्यांच्या मागे कोरस मध्ये मुला मुलींचा तसाच सश्रृध्द आवाज यायचा.
सर्वांच्या म्हणजे तमाम मुलां मुलींच्या पुर्णत्वा साठी,त्यांच्या मांगल्या साठी व त्यांच्या सुखी भविष्यासाठी हा परिपाठ रोज व्हायचा. आणि शाळेच्या दैनंदिन कामकाजाला एका अनामिक श्रध्देने,धीर गांभिर्याने सुरूवात होत असे. विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या क्षमतेमध्ये निश्चित वाढ होत असे.
शिकणं सहज होण्यासाठी ,फलदायी होण्यासाठी गुरूजींचे शिकवणे,त्यांचे सहज ,सोपे ,प्रवाही बोलणे ,विषय सोपा करून सांगण्याची गुरूजींची हातोटी व त्यांचे विषय ज्ञान ह्या गोष्टी जेव्हढ्या अवश्यक तेव्हढंच सभोवतालचे वातावरण,शिकणाऱ्या चे शांत मन या गोष्टी अधिक महत्वाच्या असतात.नाणेकरांच्या परिपाठाने हे नक्की साध्य होत असे.
सर्वांग सुंदर व्यायामाचे सर्व प्रकार ते आलटून पालटून करून घ्यायचे.सुर्य नमस्कार, सुर्याची बारा नावं,गायत्री मंत्र,एखादं छानसं ,सुंदर समुहगीत,राष्ट्रभक्तीपर गीत,शौर्य गीत या सर्व प्रकारात अनेक मुला मुलींना सामावून घेऊन ,बदलून बदलून मुला मुलींना व्यासपीठावर बोलावून ते परिपाठाची रंगत उत्तरोत्तर वाढवायचे.क्वचित पहिल्या तासिकेचे पाच दहा मिनिटं जायची तरीही कुणाची कधी तक्रार नसायची.
एक परिपूर्ण क्रिडा शिक्षक कसा असावा तर सुभाष नाणेकरां सारखा!
हे विधान कुठलाही व्यक्तीगत स्वार्थ वा आंधळी दोस्ती यातून मी करत नाही . मैदानावरील कामे तर ते करायचेच पण दिन समारंभ, देशभक्तांच्या जयंत्या ,क्रांती कारकांना अभिवादन हे त्यांच्या अंगवळणी पडलेले.कधी त्यांचं बोलणं सुसंगत ,आशयघन नसायचे पण त्यांचा श्रृध्दाभाव,त्यामागची विशुध्द भावना सहज दिसून यायची.शाळेचा क्रिडा विभाग त्यांनी संपन्न करून ठेवला.
मल्लखांब, दोरी मल्लखांब, योगासन प्रकारात त्यांचे मार्गदर्शन अप्रतिम होते व आजही आहे.मुला मुलींना खेळात पारंगत करणे ,त्यांना संस्कार संपन्न करून एक उमदं व्यक्तिमत्व त्यातुन घडत असे.
गुरूदेव रविंद्रनाथ टागोर म्हणत असत, ” पृथ्वीतलावर जन्माला येणारे मुल सोबत ईश्वराचा अंश घेऊन येते,त्याच्यातील देवत्व टिकवण्याचे वाढविण्याचे काम सर्वात आधी जन्मदाते करतात,नंतर शाळा व तिथले शिक्षक करतात आणि शेवटी समाज करतो.नाणेकर हे काम, मुलातील देवत्व टिकवण्याचेच काम करतात.
“इतनी शक्ती हमे दे ना दाता,की मन का विश्वास कमजोर हो ना ”
अशी प्रार्थना असो की ” सर्वेश्वरा,शिव सुंदरा स्विकार या अभिवादना. तिमिरातूनी तेजाकडे प्रभू ने आमुच्या जितना ” ही प्रार्थना नानेकरांच्या मागे सगळी मुलंमुली डोळे मिटून भावूकतेने म्हणायची हे दृश्य सर्वांनाच स्पर्शून जात असे.
एकदा अशीच एक नवी प्रार्थना मी त्यांना दिली व तिचे वाचन एका दहावीच्या मुलीला करण्यास सांगितले ,तीने ते अतिशय सुंदर, भावूक आवाजात केले.नंतर वर्ग सुरू झाला व त्या मुलीने विचारले ,” सर खरेच परमेश्वर अशी शक्ती आपणास देतो का?
मी म्हणालो होतो,
” नानेकर करतात तसं कर,
” देवाला मागणं घालणं आणि देवाला प्रार्थना करणं या दोन भिन्न बाबी आहेत.
सर्व कांही परमेश्वराच्या स्वाधीन आहे असं समजून प्रार्थना करायची व सर्व कांही आपल्यावरच अवलंबून आहे असं समजून प्रामाणिक पणे आपलं काम केलं की फळ मिळतंच.
सुभाष नाणेकरांचे आजही तसेच आहे.
सेवानिवृत्त झाल्यानंतर जवळपास दहा वर्ष लिटल फ्लावर स्कूल मध्ये काम केलं, कोणताही सार्वजनिक उपक्रमात नाणेकर नाहीत असं होत नाही.
उन्हाळी व्यायाम व संस्कार वर्ग नियमित चालवण्यात,व त्याचा शिबिरार्थी मुला मुलींना करून देण्यात नाणेकर कधी कमी पडले असं झालं नाही.
…नाणेकरांना मैदानावर नाणेकरांना पाहिलं की मुलांचा स्वतःवरचा विश्वास वाढतो व मुलं मुली जोराने काम करू लागतात. नाणेकरांच्या परिपाठ व एकूणच साधनेतून हे दिसून येते.
नानेकरांना शहरातील विविध संघटनांचे ,अनेकांनी आयोजिक केलेल्या परळी फेस्टिव्हल चे पुरस्कार मिळाले ,मान सन्मान मिळाला.अर्थात नानेकर सरांनी ही तेवढे योगदान दिलेले आहेच.
अनेक कुस्ती स्पर्धेत त्यांना आजही आयोजन समिती सदस्य वा पंच म्हणून बोलावलं जातं.
अश्विनी कुमार भोईर कब्बडी स्पर्धा शहरात झाल्या तेंव्हा नाणेकरांनी खूप कष्ट उपसले होते.
बीड जिल्हा क्रिडा शिक्षक संघटनेचा मानाचा पुरस्कार त्यांना मिळाला होता.
आमच्या सरस्वती विद्यालयाचे प्रजासत्ताक दिनी मोंढा मैदानावर परळीकरासाठी मोठा कार्यक्रम असायचा त्यात मल्लखांब, दोरी मल्लखांब (मुलं मुलीं) व सर्व क्रिडाप्रकार ,सामुहिक कवायती होत असत यात मेजर योगदान नानेकरांचे असायचे .
घरच्या कांही विशिष्ट जबाबदारी मुळे त्यांचा दिवस पहाटे चार पासून सुरू होतो आजही.कधी सभा,बैठकात त्यांना ऐकता ऐकताच डुलकी लागायची पण आपली व्यथा चे निमित्त करून त्यांनी कधीही काम टाळले नाही,वा कधी सूट मागितली नाही.त्यांचे आज अमृतमहोत्सवी वर्षात म्हणजे वयाच्या पंच्याहत्तर व्या वर्षी ही दैनंदिनी चालू आहे। …
नर्मदा परिक्रमेत शालीवाहन आश्रमाच्या भिंतीवर मी एक सुंदर विचार लिहलेला पाहिला होता.मी माझ्या डायरी मध्ये लिहून ठेवला आहे.तो असा,
” तीन बजे जागे सुयोगी
चार बजे जागे सुसंत
पांच बजे जागे सो महात्मा
छह बजे जागे सो भगत.
…बाकी सब ठगत ठगत…
या सुविचारा नुसार नाणेकर सुसंत आहेत..
त्यांचे स्वास्थ्य, त्यांचे यानंतरचे सहस्त्र चंद्र व नंतरचे शतकी आयुष्य सुखी व निर्मळ व निरामय ठेवण्यास ते सक्षम आहेत..तरीही
ते तसे सक्षम, सुदृढ राहोत प्रभू वैजनाथाकडे प्रार्थना करून मी आपली रजा घेतो.
…….इति….
🔷 पी एन – पद्माकर देशपांडे

