विनम्र आयएएस अधिकारीः राहुल रेखावार

🔶 व्यक्ती विशेष- राहुल रेखावार

मिशन आयएएस चे संस्थापक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांच्या मिशन आयएएस अकॅडमीतून अनेक आयएएस,आयआरएस घडले आहेत. काठोळे सरांच्या संस्थेतून अनेक नामवंत अधिकारी राज्याला लाभले आहेत. यूपीएससी च्या विद्यार्थ्यांसाठी काठोळे सरांची लेखमाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

म्हणून आम्ही ‘महाराष्ट्र न्यूज कनेक्ट’ च्या माध्यमातून यूपीएससी या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय कष्ट आणि संघर्षातून तयार झालेल्या आयएएस,आयआरएस अधिकाऱ्यांच्या बद्दल काठोळे सरांच्या लेखणीतून उतरलेले विशेष लेख देत आहोत. ते निश्चितच आपल्याला लाभदायक ठरतील अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद !

राहुल रेखावर जेव्हा आयएएस झाले तेव्हा मी त्यांना भेटायला नांदेडला गेलो. ते रामानंदनगर मध्ये राहत होते. वडील प्राध्यापक होते .पण पुढे जाऊन त्यांनी अध्यापन व्यवसाय सोडून स्वतंत्र क्लासेस सुरू केले .राहुल सरांनीच नांदेडला माझे स्वागत केले. मी त्यांना अमरावतीला येण्याची विनंती केली .अमरावतीला येऊन आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा असे त्यांना सांगितले. सोबत आई-वडिलांना पण घेऊन या असाही आग्रह धरला. कोणतेही आढेवेढे न घेता राहुल सरांनी कार्यक्रमाला येण्याची व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती मान्य केली .आम्ही संत ज्ञानेश्वर सभागृह हे अमरावतीमध्ये सर्वात भव्य दिव्य सभागृह बूक केले .राहुल रेखावर हे संपूर्ण महाराष्ट्रातील आयएएस या परीक्षेत पहिले आले होते. मी त्यांना अमरावती भेटायला आलो याचा त्यांना खूपच आनंद झाला. ठरल्याप्रमाणे मी माझी गाडी अमरावती वरून नांदेडला पाठवली. अमरावती बरोबरच आम्ही अकोला येथे देखील त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते .अमरावतीला राहुल रेखावर आले .विद्यार्थ्यांनी व आम्ही सर्वांनी त्यांचे मनापासून स्वागत केले .सरांनी विद्यार्थ्यांना आयएएस पूर्ण समजावून सांगितले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पण दिले .

आमच्या सत्काराबरोबरच आर्य वैश्य समाजाने देखील त्यांच्या समाज बांधवांनाच्या समक्ष राहुल सरांचा सत्कार व समाज बांधवांना मार्गदर्शन आयोजित केले होते. दोन्ही कार्यक्रम भव्य दिव्य झाले .आर्य वैश्य समाजाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी श्री चिंतावार यांनी पुढाकार घेतला. दोन्ही सत्कार्यानंतर आमच्या गाडीने त्यांना नांदेड पर्यंत आम्ही सोडून दिले .राहुल रेखावर सरांचा परिचय झाला तो असा .सर रुजू झाले .सरांचे लग्न ठरले आणि सरांनी आठवणीने लग्नाची पत्रिका मला पाठवली .लग्न लातूरला होते .आमचे जूनियर आय ए एस.चे काम लातूर वरूनच चालते .मी माझे मित्र व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन बालकुंडे यांना सोबत घेतले .राहुल सरांच्या विवाह समारोहामध्ये सहभागी झालो. सर पुढे अकोला येथे महाबीजला एमडी म्हणून आले. तेव्हा माझा प्रशांत भाग्यवंत नावाचा विद्यार्थी अकोल्याला राहत होता .तो आयएएस ची तयारी करीत होता. मी सरांना प्रशांतला मार्गदर्शन करण्यासाठी सांगितले. सरांनी ते आनंदाने मान्य केले. पुढे सरांची बदली झाली .प्रशांतला अडचण जाऊ नये म्हणून त्यांनी त्यांचे सहकारी व जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून असलेले श्री सौरभ कटियार या आयएएस अधिकाऱ्यांशी चर्चा केली व प्रशांतला मार्गदर्शन करण्यासाठी सांगितले .पुढे सर कोल्हापूरला जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले .आमचा त्यांचा संपर्क दूरध्वनीवरून सारखा व्हायचा .काल-परवा माझे कोकणचे कार्यक्रम ठरले. पुण्याचे कार्यक्रम ठरले .

मी सरांना संदेश टाकला. सरांचा लगेच प्रतिसाद आला .त्यांनी भेटीची वेळ ठरवली आणि मला कळवली. मी माझे मित्र व जीवन संजीवनीचे संचालक राजेश चव्हाण सर यांच्यासह पुण्याला त्यांच्या कार्यालयात पोहोचलो. सध्या ते पुणे येथे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे राज्याचे संचालक आहेत . कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही सर आमच्याशी चर्चा करीत होते. त्यांनी आठवणीने मिशन च्या कार्याविषयी माहिती जाणून घेतली. मिशनला 25 वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाची मी त्यांना कल्पना दिली आणि कार्यक्रमाला येण्याचे निमंत्रण दिले. त्यांनी ते स्वीकारले .या वयातही मी गावोगावी स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेत आहे हे पाहून त्यांनी माझे अभिनंदन केले व या कामी सहकार्य करण्याचे मान्य केले. अतिशय विनम्र आय ए एस अधिकारी म्हणून सरांचा नावलौकिक आहे .सरांची आयआयटी मधून जरी पदवी झाली असली तरी हाताची आलेली लठ्ठ पगाराची खाजगी नोकरी त्यांनी नाकारली. त्या नोकरीमध्ये त्यांचे मन रमत नव्हते .समाजासाठी काहीतरी चांगले करावे करावे या उद्देशाने त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची आयएएस ही परीक्षा देण्याचे निवडले. मनापासून अभ्यास केला आणि महाराष्ट्रातून पहिला येण्याचा बहुमान मिळवला .

सर नुसते आयएएस झाले नाही तर शासकीय योजना लोकांपर्यंत कशा पोहोचता येतील लोकांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल यासाठी ते कोणत्याही पदावर असले तरी मनापासून प्रयत्न करीत असतात .गडचिरोली जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा कार्यशाळा सुरू केल्या त्या राहुल रेखावरांनीच. एक दिवस त्यांचा फोन आला .ते मला म्हणाले काठोडेसर मी सध्या गडचिरोली जिल्ह्यात अहेरी येथे कार्यरत आहे .या भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत फारच अनभिज्ञ आहेत .तुम्ही जर आले तर जनजागृती होऊ शकेल. मी होकार दिला .गडचिरोलीला जायचे आहे .असे ड्रायव्हरला सांगितल्यानंतर त्याने चक्क मी येणार नाही असे ठाम बजावून मला सांगितले .सर गडचिरोलीला नक्षलवादी राहतात .जीवाचं काही बरे वाईट होऊ शकते असे तो म्हणाला. पूर्ण अमरावती शहरातील एकही ड्रायव्हर गडचिरोलीला आठवडाभर यायला तयार नव्हता .मग आम्ही ग्रामीण भागातून ड्रायव्हर बोलावला. श्री राहुल रेखावर व दुसरे आयएएस अधिकारी श्री उदय चौधरी जे सध्या दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयात कार्यरत आहेत या दोघांनी पूर्ण गडचिरोली जिल्ह्यात आमच्या कार्यक्रमाचे नियोजन केले .सौ विद्या देखील माझ्यासोबत होती .पहिल्या दिवशी आम्ही अहेरी येथे विश्राम भावनात थांबलो होतो .त्या ठिकाणी गरम पाणी नव्हते.

राहुल रेखावर सरांना हे जेव्हा कळले तेव्हा त्यांनी स्वतःच्या रूम मधली गरम पाण्याचा रॉड आमच्या रूममध्ये पाठवला आणि स्वतः थंड पाण्याने आंघोळ करणे पसंत केले. काल जेव्हा त्यांची पुण्याला भेट झाली तेव्हा अतिशय आदराने त्यांनी आमचे स्वागत केले आणि पूर्ण सहकार्य करायचे मान्य केले .गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात विद्यार्थ्यांना जागा करणारा वेळोवेळी वेगवेगळ्या मान्यवर तज्ञ लोकांना आपल्या कार्यक्षेत्रात बोलावून विद्यार्थ्यांना नवचैतन्य मिळवून देणारा अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे .भविष्यातही ते नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून महाराष्ट्रातील युवकांना तसेच नागरिकांना आपल्या कर्तव्यदक्षतेने भारावून टाकतील याबद्दल शंकाच नाही.

प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक मिशन आयोग अमरावती