🔷 सामाजिक सलोखा
🔶 “विश्वातील साऱ्या मानवांचे नाते हे रक्ताच्या नात्याइतकेच घट्ट आणि जवळचे आहे.”-मुजीब देवणीकर
◾परळीत ईद मिलन तसेच सद्भावना संमेलन उत्साहात संपन्न
बीड- परळी- वैजनाथ: प्रतिनिधी– परळीत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील विशेष अतिथी विश्राम गृह येथे संपन्न झालेल्या ईद मिलन तसेच सद्भावना संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून मुजीब देवनिकर सर, प्रमुख पाहुणे म्हणून परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे, ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर, भरत महाराज गुट्टे, सदभावना मंच परळीचे अध्यक्ष प्रा.एम.एल.देशमुख, हजरत मौलाना तैमूर मिल्ली साहेब, सय्यद इफ्तेखर सर (जिल्हा अध्यक्ष जमाते हिंद), या सह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
उत्साहपूर्ण संपन्न झालेल्या या कार्यक्रमात उपस्थित अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे सामाजिक सलोख्यासाठी घेतलेला हा कार्यक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगत समाजातील गढूळ वातावरण सलोख्याचे होण्यासाठी घेण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. माणसाने माणसांमधील स्वतःचे अस्तित्व शोधायचे आहे, हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे भरत महाराज गुट्टे म्हणाले. सद्भावना संमेलनास आलेल्या सर्वांचे स्वागत सय्यद इफ्तेखर सर यांनी आपल्या मनोगतातून केले.
कार्यक्रमाचे मुख्य वक्ते मुजीब देवणीकर सर यांनी सांगितले की आज साऱ्या मानवा करिता समाज टिकवण्याकरिता व देश टिकवण्याकरिता सद्भावनेचे फार महत्त्व आहे. सद्भावने शिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही. यासाठी त्यांनी पैगंबर यांचे उदाहरणही दिले.
ईद साजरी करण्यामागचा उद्देश रमजान रोजा याचा इतिहास व वास्तविकताही त्यांनी वर्णन केली. साऱ्या विश्वातील मानवांचे मूळ एक पुरुष आणि एक स्त्री आहे. या नात्याने विश्वातील साऱ्या मानवांचे नातं हे रक्ताचे नातं असल्याचंही त्यांनी सांगितले.
माणसाने आपल्या जीवनाचा उद्देश जाणला पाहिजे आपला निर्माण करता या जगात कर्म करण्यासाठी आपणाला पाठवलं आहे त्याला जाणलं पाहिजे आणि त्याची आज्ञाही पाळली पाहिजे. माणसाला नीतिमान बनवण्याचं कार्य रमजान महिना करतो म्हणून या रमजान महिन्यात मुस्लिम बांधव सदाचरण करण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. उद्या मरणोपरांत जीवनात आपल्या जीवनातील प्रत्येक कर्माचा जाब अल्हासमोर द्यावा लागेल ही जाणीव ही त्यांनी करून दिली. परळी शहरातील हास्तुत्य उपक्रम इतरत्र सर्वत्र व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास समाजातील सर्व घटकातील बांधवांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे आभार शेख साबेर सर यांनी कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी शिरखुर्मा चा स्वाद घेतला.

