🔷 महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील
🔶 रुग्णालयांची संख्या १,७९२ हून ४,१८० पर्यंत वाढविणार
मुंबई : अपघात प्रसंगी अनेकांना तातडीने उपचार मिळत नाही मिळाले तर त्यावेळेस प्रत्येकांकडे सोबत पैसे असतीलच असेही नाही . त्यामुळे अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत म्हणून राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये १ लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार उपलब्ध होण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनीं आरोग्य विभागाला दिले.
राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या वरळी येथील मुख्यालयात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनांच्या कामकाजाचा आढावा आबिटकर यांनी घेतला. या योजनांमधील रुग्णालयांची संख्या १,७९२ वरून ४,१८० पर्यंत वाढविण्यात येणार आहे. योजनेतील उपचार संख्येत वाढ, दरामध्ये सुधारणा, अवयव प्रत्यारोपणासारखे महागडे उपचार समाविष्ट करण्यासाठी अभ्यास समिती गठित करण्यात आली असून, या समितीचा अहवाल एक महिन्याच्या आत सादर होणार आहे.
🔷 महात्मा फुले योजनेच्या उपचार दरात सुधारणा होणार
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील उपचार दरात लवकरच सुधारणा केल्या जाणार आहेत. या योजनेतील उपचारांचे दर कमी असल्यामुळे अनेक खासगी रुग्णलये ही योजना त्यांच्या रुग्णालयात समाविष्ट करून घेत नाहीत.
तसेच या योजनेतील समाविष्ट उपचारांच्या पॅकेजमध्ये सुसूत्रता आणण्याबरोबरच त्यात आणखी काही उपचारांचा समावेश करावा, अशा विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्य सेवा आंयुक्तांच्या अध्यक्षतेखाली १४ तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे.

