मा.भावी सरन्यायाधीशांची आई मातोश्री प्राचार्य डॉ. कमलताई गवई

🔶 रविवार दिनांक 11 मे रोजी असलेल्या मदर्स डे निमित्त

अमरावती- अमरावतीचे सुपुत्र माननीय न्यायमूर्ती श्री भूषण गवई
हे येत्या 14 तारखेला भारताच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेऊन पदभार ग्रहण करणार आहेत. त्यामुळे आज संपूर्ण अमरावती शहरात जिल्ह्यात आणि विदर्भात पर्यायाने महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे. अमरावतीला हा बहुमान लाभलेला आहे. यापूर्वी अमरावतीच्या श्रीमती प्रतिभाताई पाटील ह्या जेव्हा राष्ट्रपती झाल्या तेव्हा देखील अमरावती बरोबरच पूर्ण महाराष्ट्र खुलून आला होता.
न्यायमूर्ती भूषण गवई यांना घडविण्यामध्ये त्यांचे पिताश्री माजी राज्यपाल श्री रा सू. गवई तसेच मातोश्री प्राचार्य डॉ.कमलताई गवई यांच्या मोलाचा वाटा आहे. वडिलांपेक्षा भूषण सरांना घडविण्यामध्ये मातोश्री कमलताईंचा वाटा हा जास्त आहे. सन्माननीय दादासाहेब गवई हे सामाजिक व राजकीय कार्यकर्ते. अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये झुंज देऊन त्यांनी स्वतःला घडविले. आमदार झाले. विधानसभा अध्यक्ष झाले आणि नंतर बिहार केरळ त्रिपुरा राज्याचे राज्यपाल झाले. दादासाहेबांच्या नेहमी फिरता दौरा. त्यामुळे भूषण सरांना घडविण्यामध्ये कमलताईंचा वाटा निश्चितच जास्त आहे

आज संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये दादासाहेबांनंतर कमलताई गवई दादासाहेबांचा वारसा पुढे नेत आहेत. त्यांनी स्वर्गीय दादासाहेब चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत शिक्षणाची गंगा आमच्या अमरावती जिल्ह्यात खेडोपाडी नेली आहे. शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करून 1932 या वर्षापासून खऱ्या अर्थाने शिक्षणाची गंगा विदर्भात आणली. त्याला दादासाहेबांनी हातभार लावला आणि स्वतःच्या शिक्षण संस्थेमार्फत समाजातील दीन दुबळ्या दलित व सर्वसामान्य माणसासाठी आपली शैक्षणिक दालने मोकळी केली .
दादासाहेब पूर्वी फ्रेझरपुरा या भागात राहत होते. त्यांची मुले मराठी शाळेमध्ये शिकले आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदापर्यंत पोहोचले. साहेबांच्या सततच्या दौऱ्यामुळे ते फिरस्तीवर असायचे त्यामुळे भूषण सरांना घडविण्याचे काम कमल ताईंनी केले आणि आजही त्या इतर समाजातील मुलांना घडविण्याचे काम करीत आहेत. मी त्यांच्या नेहमी सोबत असतो. त्यांच्या बारीक सारीक गोष्टी मी टिपत असतो आणि त्यावरून अतिशय संवेदनशील मनाच्या कर्तव्यदक्ष कर्तव्यतत्पर म्हणूनच कमलताई गवई यांचा उल्लेख करावा लागेल
इगतपुरीचे श्री गोयनका गुरुजींचे विपश्यना केंद्र संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. भारतातच नव्हे जगात या केंद्राची कीर्ती पसरलेली आहे. त्याच धर्तीवर पण लहानशा प्रमाणात श्रीमती कमलताई गवई यांनी अमरावतीच्या छत्रीतलावच्या जंगलानंतर येणाऱ्या मोगरा या गावला विपश्यना केंद्र प्रारंभ केले आहे. या विपश्यना केंद्रातून हजारो साधक आजपर्यंत तयार झालेले आहेत. कमल आईसाहेबांचे हे काम मी सर्वात मोठे मानतो .कारण विपश्यनेमुळे अंतर्गत मनामध्ये जी क्रांती होते ती खरोखरच आत्मशुद्धीसाठी आत्मोन्नतीसाठी खूपच फायदेशीर असते. या विपश्यना केंद्रासाठी आईसाहेबांनी स्वतःला झोकून दिले आहे .त्यांच्याकडे दर महिन्याला दहा दिवसांचे एक विपश्यना शिबिर असते. या विपश्यना शिबिरासाठी येणाऱ्या मार्गदर्शनासाठी येणाऱ्या सर्व मान्यवरांची व्यवस्था सन्माननीय ताईसाहेब स्वतः पाहतात. इतकेच काय त्या ट्रेनरला घ्यायला व सोडायला रेल्वे स्टेशनवर जातात. त्यांचे म्हणणे असे आहे की त्यांनी शिबिरासाठी दहा दिवस येऊन आपली सेवा दिली आहे आणि म्हणून कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचून देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.

ताईसाहेब सतत लोकांच्या संपर्कात असतात. मेडिटेशनमुळे त्यांची झोप लवकर होते .लोकांना भेटणे .त्यांच्या समस्या समजावून घेणे. त्यावर तोडगा काढणे हे कार्य ताई साहेबांचे अविरत सुरू होते आहे आणि राहिलही.मी फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये काम करीत असल्यामुळे व माझी बहीण प्रा.निर्मला काठोळे ही अमरावतीच्या कॅम्प भागातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात मराठीची प्राध्यापिका असल्यामुळे गवई परिवाराचा माझा जवळचा संबंध आला. माझ्या बहिणीला कमलताई साहेबांनी नोकरीला लावले. ती अगोदर आसेगाव पूर्णा येथे नोकरीला होती. तिची ती नोकरी गेली. मी कमलताईजवळ शब्द टाकला. कमलताईंनी अर्ज करण्यास सांगितला . मुलाखतीला बोलावले. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी महाविद्यालयात मराठी विषयासाठी तिची निवड केली.

विपश्यने बरोबरच कमलताईंनी एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. तो म्हणजे वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन. त्यासाठी त्यांनी सर्वात प्रथम आपल्या अमरावतीच्या काँग्रेसनगर मधील घरासमोर जे डिव्हायडर आहे त्या पूर्ण डिव्हायडरवर झाडे लावली. रोज किमान पाच झाडे लावण्याचा संकल्प त्यांनी सोडला आणि तो सातत्याने पूर्ण होत आहे. विपश्यने बरोबर याही कामाला त्यांनी वाहून घेतले आहे. त्यासाठी पत्रके प्रकाशित करणे व ती सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी वितरित करणे हे मोलाचे काम त्या करीत आहेत.
आमचे मिशन आय.ए.एस. ही चळवळ त्यांना आवडली आणि म्हणून त्यांनी या चळवळीमध्ये आमच्याबरोबर सहभाग दर्शविला. मिशनच्या अनेक स्पर्धा परीक्षा कार्यशाळेमध्ये त्या सहभागी होतात. न्यायमूर्ती भूषण गवईच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी झाली त्याचा लेखाजोखा विद्यार्थ्यांना सांगतात. आणि लोक देखील उत्साहाने त्यांचे व्याख्यान ऐकतात. आम्ही सर्व साधारणपणे दररोज पाच स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेतो. कमलताई म्हणतात अजून एक दोन घ्या .कारण माझ्या जीवनाचा उत्तरार्ध आहे
आणि या जीवनातला प्रत्येक क्षण प्रत्येक मिनिट मला उपयोगात आणायचा आहे. पाच कार्यक्रम करून देखील त्याच थकत नाहीत आणि याचे रहस्य त्यांनी केलेल्या विपशनेमध्ये आहे. त्या विपशनेच्या वरिष्ठ आचार्य आहेत.

ताईंना मागे दिल्ली येथे जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जीवन गौरव पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे ठिकठिकाणी सत्कार झाले .या सर्व ठिकाणी त्यांनी विपश्यना वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन व मिशन आय ए एस यावर भर दिला.
या रविवारी मदर्स डे आहे. त्यानंतर 14 तारखेला न्यायमूर्ती भूषण गवई सर सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत. त्यानिमित्त कमलताई साहेबांना मनापासून हार्दिक शुभेच्छा.

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003