आमचं एक सुईच्या टोका एवढेही वैर नाही !

नारळी सप्ताहात मुंडे बहिण भाऊ एकत्रित येण्याचे संकेत नव्या राजकारणाची नांदी

बीड- एम एन सी न्यूज नेटवर्क – संत भगवान बाबा यांच्या फिरत्या नारळी सप्ताहात भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात मनोमिलन झालेले पाहायला मिळाले. यामुळे बहीण भावातील संघर्षाची दरी कमी झाल्याची व्यासपीठवरुन दोघांनी घोषणा केली. सत्ता संघर्षावरून अनेक वर्षापासून सुरू असलेल्या मुंडे बहिण भावाचा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. मात्र, याच संघर्षाला भगवान गडाच्या पायथ्याशी भारजवाडी गावात नारळी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी पूर्णविराम झाल्याची कबुली दोघा बहीण भावाने दिली.

पंकजा आणि धनंजय मुंडे व्यासपीठावर एकत्र

याप्रसंगी पंकजा मुंडे यांनी बोलताना माझा भाऊ मोठा झाला असेल तर मला आनंदच आहे, असं म्हणून या संघर्षाला पूर्णविराम देण्याची सुरुवात केली. यावेळी उपस्थित जनसमुदायाने टाळ्या वाजवून सादही दिली. धनंजय नंतर चार वर्षांनी माझा जन्म झाला. त्याचं काहीतरी कारण असेल. कुळाचा उद्धार करण्यासाठी एकाला दोन असतील तर काय झालं दोघेही आम्ही पराक्रमी आहोत. त्याचा पराक्रम माझा पराक्रम वेगळा, त्याचा पक्ष वेगळा माझा पक्ष वेगळा आहे. दोघं एकाच पाठीवरती जन्माला आलो. आमचे भविष्य काही वेगळं असेल. त्यासाठी काही वेळा वाट पाहा, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी बहिण भावाच्या एकत्रिकरणाचा नवा संकेत दिला आहे.

पंकजा मुंडे यांच्या भाषणानंतर धनंजय मुंडे उभा राहिले. या मनोमिलनाची री पुढे ओढत भारजवाडीला भारगजवाडी असा उल्लेख मी मुद्दामून केला असं म्हणत धनंजय मुंडे यांनी आमच्या दोघा बहिण भावाच्या नात्यांमधील काही गज का होईना अंतर या नारळी सप्ताहात कमी झालं अशी कबुली दिली.

आम्ही दोघे वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या विचाराने काम करतो. विचारांमध्ये भलेही कोसवांतर दूरी असली तरी चालेल वर घरामधल्या संवादामध्ये एक तसूभर सुद्धा अंतर नसले पाहिजे. ते अंतर कमी झालं. मुंडे कुटुंबातील गडाच्या भक्ती संदर्भात कोणीही संशय घेण्याचं कारण नाही, असं म्हणत गडाच्या वादावर पूर्णविराम दिला.

मोठा भाऊ या नात्याने लहान बहीणनी ने जे भगवानगडासाठी करायला सांगितलं आहे, ते मी सर्व करेल असं म्हणत आमच्या विचाराच्या वाटण्या आहेत. आमचं एक सुईच्या टोका एवढेही वैर नाही नाही. राजकीय विचाराच्या वाटण्या आहेत, असं म्हणत धनंजय मुंडे संघर्षाला पूर्णविराम दिला.  धनंजय मुंडे यांनी जे होतं ते बऱ्यासाठी होतं असं म्हणताना पंकजाताई दोन वेळेस आमदार राहिल्या. त्या मंत्री झाल्या त्याच पद्धतीने मी आमदार झालो विरोधी पक्ष नेता झालो आणि मंत्रीही झालो जर असं झालं नसतं तर दोघांपैकी कोणीतरी एकच मंत्री झाला असता, असं तुम्ही समजून घ्या म्हणत धनंजय मुंडे यांनी आम्ही दोघे एकच आहोत असे संकेत दिले.

गेल्या अनेक वर्षापासून सत्ता संघर्षात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढले होते. तसेच आमच्या दोघात बहिण भावांचे नाते काहीच उरले नाही असे देखील धनंजय मुंडे यांनी म्हटले होते. मात्र, भगवानगडाच्या पायथ्याशी हजारो भाविक भक्तांच्या समोर आज पंकजा आणि धनंजय मुंडे यांचे मनोमिलन झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मुंडे बहिण भाऊ एकत्रित येण्याचे संकेत नव्या राजकारणाची नांदी दाखवून देत आहेत. त्यामुळे येणारा काळच या संदर्भात दाखवून देईल.